कोल्हापूर (प्रातिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत याचे आयोजन करण्यात होते.
सकाळी ७ वा.दसरा चौक ते अंधशाळा मिरजकर तिकटी या मार्गावर राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सदर दौडचे उद्घाटन अंधशाळेच्या अंध शिक्षिका वैभवी सुतार व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
सदर राष्ट्रीय एकात्मता दौड मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृष्णराज महाडिक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, चेतना विकास मंदिरचे चेतना व्यवसाय केंद्र, राही पुनर्वसन केंद्र, जिज्ञासा शाळा, स्वयंम मतिमंद शाळा,वि.म.लोहिया कर्णबधिर शाळा, अंधशाळा अस्थिव्यंग कार्यशाळा अशा कोल्हापूर शहरातील दिव्यांग शाळेचे मूकबधिर १०, अस्थिव्यंग २०, अंध ८ व बौद्धिक अक्षम्य ४२ असे एकूण ८० विद्यार्थी, मुख्याध्यापक, दीव्यांग शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेबाबतच्या घोषणा दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी अंधशाळेमध्ये झालेल्या राष्ट्रीय एकता दौडच्या सांगता समारोहमध्ये घटनेने सर्वांना समान अधिकार व हक्क दिलेले आहेत. यामुळे सर्वांचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास असून सर्वांच्या विकासातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाते, असे सांगितले.