पुराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : पुराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, पुराचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनासह पूरग्रस्त भागाचा आज दौरा केला व नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला.

बापट कॅम्प, जाधववाडी, साळोखे पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, वागळे मळा, रमण मळा परिसरास आमदार जाधव यांनी भेट दिली. बापट कॅम्प येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याबरोबरच गणेशमुर्ती सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था करावी अशा सूचना आमदार जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. पूराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनाची वाट न पाहता स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. पूरग्रस्तांच्या स्थलांतरीत ठिकाणांची प्राथमिक सुविधा व आरोग्य सुविधासह पार्किंग व जनावरांची सोय करावी अशी सूचना आमदार जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिले.

आमदार जाधव म्हणाल्या, तमाम कोल्हापूर शहरवासीयांना विनंती आहे, कोणताही धाडसी निर्णय अथवा कृती करू नका. कोरोना व महापूराच्या संकटाचा सामना करताना प्रशासनाला सहकार्य करा.

यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे,अग्नीशमन दलप्रमुख तानाजी कवाळे आरोग्याधिकारी विजय पाटील यांच्यासह महापालिकेचे आरोग्य निरीक्षक मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.

माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, सागर तहसीलदार, पिंटू बोरपाडळेकर, मुकुंद खाडे, पंकज काटकर,  नीलेश भोसले, मारुती कांबळे, अथर्व चौगुले, प्रदीप डकरे, संपत चौगुले, माजी नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, संदीप ऊर्फ पप्पु सरनाईक, गणेश शिंदे, अॅड. रवी जानकर, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.